सत्य आणि स्वप्न !!

सत्याची, वास्तवाची जाणीव बुद्धी वारंवार आपल्याला करून देत असतेच तरीही मन मात्र देहमान विसरून स्वप्नांच्या भराऱ्या मारण्यात दंग असते.


"मन एवढं, एवढं..... आता होतं भुईवर गेलं गेलं आभाळात" मनानं आपला "मुक्तपणा आणि आवाका" अधोरेखित करण्यासाठी मुद्दामहून म्हटलं. अल्लड मनाची हि टिका वैचारिक,परिपक्व बुद्धीला कळायची, पण त्याचवेळी तिला मनाच्या स्वप्नद्रुष्टीचं, कल्पनाविलासाचं कौतुकही वाटायचं. म्हणून बुद्धी संयम राखत शांतच राहायची. पण बुद्धीचं अपत्य असलेल्या कडू सत्याला ते टोचलं. सत्याने लगेच तोफ डागली..... " हो... हो, आभाळात सहज जाता पण पाय भुईवर नसतात त्याचे काय? " सत्य कडू असतं हे पुन्हा मनाला पटलं.

" अरे आम्ही तर पृथ्वीवर राहून स्वर्गातही फेरफटका मारून येऊ शकतो" आता मनाची कड घ्यायला स्वप्न कुठसं जागं झालं.

"हो स्वर्गात फिरायला सगळे उत्साही असतात हो!.... पण मरायला कोनीच तयार नसतो त्याचे काय?" सत्याने स्वप्नाला अजून एक वास्तववादी टोला हाणला.

"मी म्हणतो, जर क्षितिजाच्या पलीकडे पाहण्याचं स्वप्न आणि दृष्टी असेल तरच क्षितिज गाठता येऊ शकते,... हे निर्वादित सत्य आहे" स्वप्नाने ताकद दाखविली.

"अरे पण क्षितिजाला अंत नसतो,... म्हणून आपलं क्षितिज आपणच ठरवायचं असतं, आप आपल्या ताकदीप्रमानं..... " सत्याचा सल्ला. स्वप्नाजवळ असलेल्या कल्पनाशक्तीची वास्तवाशी सांगड घातली की यश हमखास ह्याची सत्याला जाण होती.
"स्वप्न म्हणजे सुखद वाऱ्याची झुळुक, अंगावरून गेली की अमाप सुख देऊन जाते. स्वप्नाविना जीवन भकास, ऑक्शिजन वींना जळणारी काडी विझते तसं स्वप्नांविना जीवन विझून जाते" स्वप्नानं आपलं महत्त्व गायलं. सत्याला ते जरासं पटलं पण त्यानं आपला हेका न सोडता म्हटलं. " पण स्वप्न जर साकार झालं नाही तर त्याचा सारखा वैरी नाही, मग ते तुम्हाला उध्वस्थ करते. वास्तवहीन स्वप्न पाहिलेली कैक जन उध्वस्थ झालेत ना" हळूहळू चर्चा रचनात्मक होवू लागली होती.
"डोनाल्ड कर्टिस म्हणाले होते We are what and where we are because we have first dreamed it. स्वप्न पाहणे किती महत्त्वाचे आहे बघ? " स्वप्नाने आपली बाजू पुन्हा लावून धरली
.
"स्वप्न तर आपण झोपेतही पाहतो, क्षणोक्षणी, पदोपदी पाहतो, पण असली स्वप्ने नंतर आठवतही नाहीत. स्वप्न म्हणजे जे आपण झोपेत पाहतो ते नव्हे तर जे आपण जागेपणी पाहतो आणि जे आपली झोप उडविते ते, "जागेपणी" म्हंजे फक्त डोळे उघडलेले असे नाही तर आपला आवाका, आर्थिक आणि शारीरिक ताकद, ते साकारण्यासाठी हवी असलेली वास्तववादी बुद्धी यांची पुरती कल्पना असणे होय" सत्याने त्याचे तत्त्वज्ञान मांडले. स्वप्नाला हळू हळू वास्तवाची जाण ठेवण्याचं महत्त्व पटू लागले.

"स्वराज्याचं स्वप्न शिवरायांनीही पाहिलं, पण ते साकारताना त्यांनी सदैव वास्तवाचं भान ठेवले होते. मुघल, आदिल यांच्या घासालाही आपण पुरणार नाहीत हे वास्तव स्वराज्याच्या स्वप्ना बरोबरच त्यांनी सदैव ध्यानी ठेवले होते. कधी माघार, कधी तह, तर कधी आक्रमण करत त्यांनी स्वप्न साकार केलेच.... श्वासात भिनलेलं स्वप्न ठेचा लागल्यानं वाऱ्यावर सोडून दिलं नाही.. स्वप्नाच स्थित्यंतर ध्येयात व्हायला पाहिजे. " सत्यानं स्वप्नाला दाखला दिला.

दोघांनाही एकमेका सोबत गेल्याशिवाय यश मिळणार नाही याची खात्री झाली.

" भान ठेवून स्वप्न, ध्येय ठरवायचे आणि बेभान होवून त्याची अंमलबजावणी करायची... "स्वप्नाने अनुमोदन दिले.