२००९- आले आणिक तसेच गेले.

हेही वर्ष मागच्या सारखेच संपले. भरभराट काहीच झाली नाही. वर्ष संपले, दुःख तसेच राहिले. नवीन वर्षही यापेक्षा काय वेगळे असणार?. (म्हणूनच वर्षारंभाचे काही देणं घेणं नाही, त्याबाबतही अगदी साळसूद आहोत)


कसाबची गैंग लाटेवर स्वार होवून सावधपणे बेसावध मुंबैत घुसली, त्यांनी मुंबई धुतली. किलकिल्या डोळ्यांचे आर. आर. बोलपाटिल बोलून फसले, आणि मंत्रालयात पोहचायच्या आत त्यांची उपमुख्यमंत्र्यासह गृहमंत्र्याचीही खुर्ची गायब झाली. पण २००९ चा पायगुण चांगला म्हणून "फिरून परत भोपळे चौकात" तसे आर. आर. परत गृहमंत्री झाले.

हलक्या फुलक्या विलासरावांनाही मुख्यखुर्चीतून मेणबत्तीवाल्यांनी खाली ओढलेच. २००९ ने त्यांना "अवजड" मंत्री करून सांत्वन (डिग्रेडेशन म्हटलं तरी चालेल, नाहीतर महाराष्टातून राजकीय हद्दपारीच म्हणा) केले. एव्हाना शिवराज पंaपाटलांनाही आपल्या साऱ्या सुटांसह नातवंडांना संभाळण्या साठी लातूरलाच धाडण्यात आले. (मिडिया आणि मेणबत्ती वाल्यांची ही कारागिरी)

हे मेणबत्ती वाले नंतर (मतदानाच्या दिवसी) दिसलेच नाहीत. (अन्यथा पुन्हा कांग्रेस आली असती काय? )

यावर्षी नारायण राणेंनी बरीच (म्हंजे अनेक) राजकीय वादळे उठविली, मात्र दुसऱ्यांचे छप्पर उडायच्या ऐवजी त्यांचे २-३ समर्थक आमदार तंबुसोडून पळाल्यामुळे राणेंचेच वासे कोलमडले. या वर्षात कैक वेळा ते घोड्यावर बसून दिल्ली ला गेले पण मैडमने त्यांना गाढवावर बसवून माघारी पाठवले. मुख्यमंत्रिपद दूर पण हद्दपारीचा लखोटा मात्र मिळाला. २००९ मध्ये रानेंच्या "स्वाभिमानाची" शेपटी हालविणारी शेळी झालेली दिसली.

यावर्षी पावसाचा अंदाज आलाच नाही. वाऱ्याची दिशा कशी, कुठे, कधी बदलली ते कळलेच नाही. राजकीय वारं हि तसेच होते. अशोक चव्हाण परत मुख्यमंत्री झाले आणि आमचं ते प्रथम मुख्यमंत्री झाले होते तेव्हा "आ" झालेलं तोंड अजूनही आवासुनच आहे. महाराष्टाचा मुख्यमंत्री कसा नसावा ह्याचं अप्रतिम उदाहरण म्हणेन मी. हायकमांड म्हंजे काय असते तेही समस्त महाराष्टाला यांच्या दूर-दुष्टी मुळे कळले.

मराठा आरक्षणाची गणगवळण यावर्षी फडावर आली होती, पण त्यांना गर्दी काही खेचता आली नाही. निवडणुकांचा बाजार संपताच अ-विष्णुअवतारी खेडेकर, मेटे आदी मंडळीच्या तोंडून आरक्षणातला "आ" देखिल परत ऐकायला आला नाही.

वरळी च्या सी लिंक वर स्व. राजीव गांधीनी स्व. स्वा. वीर सावरकरांवर कुरघोडी केली. अगदी डॉ. आंबेडकर, पुं. ल. देशपांडे आदी रेस मध्ये होते पण परत एकदा महाराष्टाची पवार, चव्हाण, देशमुख यांच्या साक्षीने उपेक्षा झाली.

लोकसभेने पवारांच्या रा. कॉ. ला चांगला दणका दिला. राजू शेट्टी आणि सदाशिवराव मंडलिक तर हात धुऊन पवारांच्या मागे लागले होते. लवासा उर्फ लेक सिटी, अजितदादांचा हवामहल,सडका गहू, महागाई, कर्जमाफी, ऊसाची टिपरं, (मोफत? )वीज, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कैक मुद्दे पवारांना गुद्दे देत होते, आता पवार संपताहेत की काय असं वाटत होतं पण विधानसभेला सावरले ते. खा. पद्मसिंह पाटलांना वर्षाच्या मध्यावर थोडासा मनस्थाप भोगावा लागला. पण आता ते वरदहस्तामुळे सुखरूप बाहेर निघताहेत असे दिसते.

पैसा, फोडाफोडी, उसनवारी आणि निवडून येईल त्याला उमेदवारी ह्या गोष्टीचा महाराष्टाच्या राजकारणात यावर्षी चंगळवाद झाला. बराच तरून वर्ग यावर्षी राजकारणात सक्रिय झाला. ( तरुण म्हंजे राजकारण्यांची मुले एवढाच अर्थ) नितेश राणेंचा (आणि त्यांची कुठलीशी संघटना आहे तिचा) इथे विशेष उल्लेख करावा लागेल.

२३ ऑक्टोबरला सकाळपर्यंत उद्ववाचेच सरकार येणार असे वाटत होते पण दुपारी ते गाजर आहे हे स्पष्ट झाले. जनता जनार्धानाला परत आघाडीचेच "अजब" सरकार हवे होते. सेनेसाठी २००९ २००४ सारखाच दुर्दैवी ठरला, तर ह्याच वर्षी राजठाकरेंनी आपली तटबंदी मजबूत असून मनसेचा मारा किती पल्ल्यांचा आहे हेही दाखवून दिले. वर्षभर ते बऱ्याच ठाण्यांना हजेरी लावत फिरत होते. बिहार, उ. प्रदेश, हरियाना इकडून देखिल वर्षभर त्यांना हजेरीसाठी निमंत्रणे येत होती. हिंदी बोलणारे कलावंत मराठी स्टेजवर (उत्सफुर्तपणे? ) यायला लागले आणि न विसरता "मी महारष्टियन आहे" असंही मोडक्या मराठीत सांगायला लागले. हा या वर्षीचा सकारात्मक बदल म्हणावा लागेल. काठ्या वाटपा पासून ते मार खाई पर्यंत अनेक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय आबू आझमींनी हजेरी लावली.

नोव्हेंबराला बाळासाहेबांवर टिका केली म्हणून शिवसैनिकांनी निखिल वागळेंना मारले. ते निर्भीड पत्रकार आहेत हे महाराष्टाला यावर्षी पुन्हा एकदा कळले. (९ वेळा हल्ला झाला तरी ते पत्रकारितेचा "हेका" सोडत नाहीत याला म्हणतात निर्भीड.) आम्ही निरपेक्ष, आम्ही लोकशाहीचा चोथा खांब म्हणताना "पेड पत्रकारितेवर" हा निर्भीड पत्रकार एक चकार शब्दही बोलला नाही.

महाराष्टासाठी अजून एक अभिमानाची बाब घडली. नितीन गडकरींना भाजपाचे राष्टिय अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. आता २०१० मध्ये त्यांनी स्वतःचे पोट कमी करून आपल्याला मान आहे हे दाखवून दिले पाहिजे.


अश्या कैक राजकीय घटना या वर्षी होवून गेल्या. महाराष्टाचा "विकास" झाला असं म्हणण्यासारखं विशेष असं काही ह्या वर्षी घडलेलं दीसलं नाही. वर्ष संपले, महाराष्ट मात्र परत तस्साच राहिला.

7 प्रतिक्रया:

Sagar !**!anjare ने कहा…

Uttam Lihatos mitra tu.

Keep it up.

Onkar ने कहा…

Agadi barobar mitra

Unknown ने कहा…

नमस्कार, सचिन,

तुमचा हा लेख समयोचित तर आहेच,आणि युक्त पण वाटला. आता फ़ॅशन झालेली आहे - नवं वर्ष, नवं दशक, नवं शतक, नवं सहस्त्रांक...मिडिया पब्लिकला पेटवत असतात, पर्यायाने बाजार पण. चांगला समाचार घेतलाय तुम्ही.
शेवटी घेतलेला "समाचार" घ्यायला अशीच भाषा - "तिर्यक" - वापरयल हवी. आतापर्यंत जातीभेदाचा ब्रह्मराक्शस समाजाच्या मानगुटीवर बसला होता, जो अजूनही आहे.. आता तो धर्मभेद, भाषाभेद, प्रांतभेद..;. पांघरून आला आहे. आपल्या बहुविध समाजाला एकजण ध्रूवीकरणाकडे नेत आहे, तर उदारमतवादी त्याला समजातीकरणाकडे (homoginiation), एकसंवर्धनाकडे (monoculture) नेत आहे.

अभारी
रेमी

साळसूद पाचोळा ने कहा…

@ रेमीजी,

जातीभेदाचा राक्षश मानगूटीवरच आहेच, आता राजकीय स्थीती पाहता तो पुढेहि तसाच राहिल यात शंकाच नाहि, आणि आता त्याच्या जोडिला भाषाभेद आणि प्रांतभेद नावाचे त्याचेच रिश्तेदार आलेत. अगदिच योग्य आहे आपले म्हनने. ह्या राजकिय नेत्यांना धर्मभेद हवाच आहे...अगदी कांग्रेस पासून ते स. पा पर्यंत..... समाजात असले भेदभाव निर्मान करुनच तर राजकिय नेत्यांची रोटी चालू असते. ती पुढेही चालू राहिल...

ह्याच अनुषंगाने, ह्या वर्षाच्या शेवटी विदर्भवादी पुन्हा जागे झाले हे नोंदवाचे राहिलेच...

फक्त शाब्दिक समाचाराने किंवा शाल जोडीतले दिल्याने हे सुधरतिल असेही नाही हो, निलाजरे असतात सारे.

अजून एक, समजातीकरन खरचं शक्य आहे काय? आपनास काय वाटते?

@ सागर, ओंकार... धन्यवाद मित्रांनो.

Unknown ने कहा…

समजातीकरण अर्थातच कठीण आहे. पण संपूर्ण शिक्षण पध्दती मात्र त्याच्यासाठी राबवली जात आहे. यात सत्तेचे केंद्रीकरण पण आले. "हिंदी" राष्ट्रभाषा करण्यात उत्तरेचा व नोकरशाहीचा हात होता यात शंकाच नाही. हे एक उदाहण; आणखीही आहेत.
-- रेमी

Unknown ने कहा…

ता.क.
मार्केटने कितीही प्रचार केला तरी नवं वर्ष काही जादूची कांडी घेऊन येत नाही. खिशाला मात्र चाट लागते! देशी नव्या वर्षाना उत्सव करायला निदान वसंताच्या आगमनाचे निमित्त तरी असते.

-- रेमी

साळसूद पाचोळा ने कहा…

देशी नव्या वर्षाना उत्सव करायला निदान वसंताच्या आगमनाचे निमित्त तरी असते.
.
वसंताचे निमित्त..मनोमन पटले.

एक टिप्पणी भेजें

..मनापासुन ध्न्यवाद..